Saturday, September 15, 2018

साहचर्य


फोटो क्रेडीट : गुगल



आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर प्रत्येकाच्या वाट्याला असंख्य परीक्षा पाहणारे ,अपेक्षाभंगाचे प्रसंग येतात त्या वेळी अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातले असंख्य निर्णय चुकतात ,प्रयोग फसतात आणि मग असे अनुभव आले की काही काळ निराशा आल्याची भावना, मानसिक थकलेपण आपल्याला येऊ लागते. तरीही या सर्वातून बाहेर पडताना आपली आपल्याला ओळख पटत असते हा स्वानुभव आहे.अशा अनुभवातुनच आपण घडणार आहोत असं स्वतःच्या मनाला समजावणं आणि स्विकारणंही तितकंच आवश्यक ! 

स्वतः निर्णय घेत जगतांना काही जण थोडे बहुत दुखावलेही जातात मात्र आपण फार काही गमावत नाही हेही आपल्याला कालांतराने समजू लागतं !  थोडक्यात काय तर आपण आधी स्वतःसोबत जगायला शिकलं पाहिजे. यामुळे स्वतःची निर्णय क्षमता तर वाढतेच शिवाय स्वतःचा स्वीकार, दुसऱ्यांना अधिक खोल जाऊन समजावून घेऊन, स्वबळावर जगण्याच्या आणि जगणं सुंदर होण्याच्या अनेक शक्यता आपल्याला दिसू लागतात. यातूनच आत्मचिंतनाची आणि आत्मपरीक्षणाची सवय आपल्या मनाला आणि मेंदूला होते. 

आपण जन्माला आल्यापासून एकाच शाश्वत आणि चिरंतन सत्य आपल्याला सोबत करत असते. ते म्हणजे 'स्वतः ची सोबत'... थोडक्यात काय तर ....
मै जिंदगीका साथ निभाता चला गया ...

खरं तर हा प्रवास म्हणावा तितका सोपा ही नाही आणि अवघड ही नाही !  सतत प्रयोग करत राहण्याची हिंमत असेल, आपल्याला स्वतःला काय हवं आहे ही भूमिका ठाम असेल आणि स्वतःमध्ये बदल करण्याची जर आपली तयारी ,उत्साह असेल तर आपलं आयुष्य अनेक वाटांनी बहरु शकतं. मग अमुक एका घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होत नाही. किंवा तो निर्णय तात्कालिक परिस्थिती पुरताच चुकीचा ठरतो ! 

तसं म्हटलं तर ,आपण कोण कुठली सगळी बंधनं तोडून जगत असतो ? कितीतरी तडजोडी आपण जगताना करतच असतो की ! पण त्या तडजोडी मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजे तर त्यातआनंद असतो आणि मग ती स्वातंत्र्याच्या परिभाषेत मोडतात. रसरशीतपणे, उत्साहाने जगत असताना कामात बुडून जाऊन त्यातली वेगवेगळी आव्हाने पेलतांना आनंद इतका मोठा असतो हे कळायला लागल्यानंतरच निर्भयता आणि आत्मगौरव प्राप्त होतो ! आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा ताकद लागते असे म्हणतात आणि ही ताकद आपल्याला या स्वतःच्या साहचर्यातूनच येते !
                                    
                                                               - आरती बोराडे

1 comment:

kamalakar desale said...

आरती, हा स्वतःशी केलेला आत्मसंवाद खूप आवडला.

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...