वाक्यात विराम असतो ना थोडासा श्वास घेण्यासाठी थांबण्याचा काळ .......! पॉज् .... म्हणजे थांबणं. भावनांचा आणि विचारांचा आविष्कार करण्यासाठी जसा लेखनात विराम महत्त्वाचा तसा आयुष्यातही ऊर्जेसाठी हा विराम ठरणारी माणसंही तितकीच महत्त्वाची ! यति वगैरे नाही म्हणणार मी पण अशी माणसं ही उर्जेचं ठिकाण असतं ,असं मला वाटतं ! पॉज .... ! कधी येतो तर कधी घ्यावा लागतो ,कधी वाक्य पूर्ण होत आणि आपण सहजच थांबतो.हा पॉज् कधी अल्प असतो तर कधी मोठा असतो! बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द आणि वाक्यामध्ये जसा हा विराम महत्वाचा तसंच आयुष्याच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर आयुष्याचा नीट अर्थ उलगडावा म्हणून अशी विराम ठरणारी ऊर्जेची चिन्ह आपल्या आयुष्यात येतात! तीच असतात आपल्या ऊर्जेचा पॉज्! काही माणसे पूर्णविराम, जी आयुष्याच्या पूर्ण काळापर्यंत स्नेहबंध जोडून जातात. काही अल्पविराम , काही स्वल्पविराम तर काही अगदीच प्रश्नचिन्ह सुद्धा! आणि या अशा विविध चिन्हांच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्याच लेखनही अर्थवाही आणि सहज सुलभ होतं जातं यात काही शंकाच नाही!
म्हणजे बघा हं आपण एखाद्या नवीन ठिकाणी नोकरीनिमित्त जातो. तिथे काही काळ नोकरी करतो बदली होते, नवीन ठिकाणी जातो. पण आधीच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांची attachment आपल्यासाठी ऊर्जास्रोत झालेली असते. कधीकधी ही attachment आयुष्यभर राहते, हे स्नेह धागे आयुष्यभर जोडले जातात तर कधी फक्त थोड्याच काळात पुरती मर्यादित राहतात. पण असतात मात्र ऊर्जास्रोत! त्या त्या वेळी त्या त्या काळी आपल्यासाठी झालेली! किंवा कधीकधी अचानक काहीतरी काम पडतं आणि कुणीतरी धावून येतो आपल्या मदतीला!
आपली जिवलग मैत्रीण, सखी, कामाच्या ठिकाणच्या मैत्रिणी, समोरच्या आजी, शेजारच्या काकू, वॉचमन ताई, कामवाल्या मावशी , गाडीमध्ये सोबत जाणारे सहकारी, शेजारच्या डेस्कवरचे सहकारी, ऑफिसमधले सहकारी, किंवा तालुक्यातले जिल्ह्यातले आपल्या क्षेत्राशी संबंधित जवळचे अनेक लोक, आता तर व्हॅटस् अॅप समूहाच्या द्वारे पण कितीतरी लोक आपल्या संपर्कात येतात. त्यातला चांगला वाईट असा दुनियादारीचा भाग जर सोडला तर काही चांगल्या लोकांशी खूप चांगले संबंध तयार होतात! चांगल्या मैत्रिणी मिळतात , काका , दादा ,ताई अशी छान नातीही तयार होतात ! अडीअडचणीला एकमेकांना मदत करतात! थोड्या काळासाठी का असेना पण अशी प्रेमाची नाती असतात! हे पॉज् आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात !
असे हे विराम कळणं ,उमगणं ,समजणं आणि त्यांना सांभाळही तितकच महत्त्वाचं! विरामचिन्हं शिवायच आयुष्य कसं निरस असेल नाही! चला तर मग आयुष्यातल्या अशा विराम चिन्हांचा शोध घेऊ या ! त्यांना जपू या ! सांभाळू या ! तरच आयुष्याचं लेखन हे अर्थवाही सुगम आणि खरोखर सुंदर होईल !
-आरती बोराडे