Sunday, February 11, 2018

एक गाव

एक गाव वसलाय
माझ्या छोट्या खिडकीशी 
शांत झालेला गलका 
बोलू लागला स्वतःशी 

अदबीने पहुडले 
मेंदीचे गोंदण तिथे
काळ्याकुट्ट आकाशाचे 
भावबंध चांदण्यांशी

तिरिपवेडे कवडसे
वेचते अंगणातूनी
अलगद शिंपलेले
रंगधागे आकाशी

मातीच्या गर्भातूनी
हिरवळली दिठी ही
स्वप्नदाणे पेरलेले
उगवून ये भुकेशी

त्रिमितीच्या पारदर्शी
कडांतुनी सांडलेले
अनवट सावल्यांचे
प्रतिबिंब हृदयाशी

'मी' पण निजले सख्या
बाहुपाशी गंधाळूनी
एकांगी चुरस लागे
आवेगाची ती काळाशी

         -आरती बोराडे


हो ... ! आहे माझा व्हॅलेंटाईन !

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*हो !  आहे माझा व्हॅलेंन्टाईन ...*
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
               
*जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू*
*जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू*

*पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू*

*सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू*

                  अगदी जिवाचा जिवलग ! काळजाचा तुकडा !तुकडा कसलं आख्ख काळीजच ! आठ वर्षांचा आमचा प्रेमाचा सहवास. पुढच्या संपूर्ण श्वासांना जोडलेला ! 

                   काय , किती अन् कसं सांगू आमच्या दोघांबद्दल ... ! कुठून सुरूवात करावी बरं ? चॉकलेट पासून करूया का ? कारण चॉकलेट्स त्याला एवढी आवडतात की बस्स ! कदाचित माझ्यापेक्षाही जास्त ! आमच्यासाठी तर रोजच चॉकलेट डे असतो ! इतकी सारी चॉकलेट्स घरात असतात ! ती फक्त त्याला देण्यासाठी ! आपण मात्र मग मुद्दाम त्याच्याशी भांडावं, त्याला चिडवाव आणि तो रुसला की त्याची समजूत काढावी! आणि फुलं...! फुलं तर त्याला खूप प्रिय आहेत. फूल आणलं म्हणजे हळुवार तो आपल्या गालांवर फुलाचा स्पर्श करणार! मस्तपैकी डोळे बंद करून सुवास घेणार आणि मला गच्च मिठी मारून thank you पण म्हणणार ! अशा काय अन् किती आठवणी! आणि किस वरून तर आमच रोज भांडणं होणार ! कारण मला हवा असतो kiss! त्याच्या दोन्ही गालांवरचा ! आणि तो मात्र देणार नाही सहजासहजी !
          मला आठवतं खूप सुरुवातीलाच मी त्याला टेडी आवडतात म्हणून टेडी बनवायचे शिकूनच घेतलं! आणि त्याच्यासाठी टेडी बनवले! पण टेडीमुळे माझ प्रेम वाटल गेला असं वाटायला लागलं teddy बनवल्यावर!
         तो नसला की मग मात्र सारं जग सुन सुन होत ! कारण माझ्या कुशीत शिरल्याशिवाय त्याला झोप येत नाही ,हे मला ठाऊक आहे आणि मी तरी कुठे राहते त्याच्याशिवाय? त्याचे खाणं ,पिणं ,उठणं ,बसणं ,खेळणं बागडणं , हुंदडणं सगळ सगळ अगदी काळजात भरून राहिलय ! हो ...आहे तो माझा व्हॅलेंटाईन!
           त्याच्यासाठीचा असणारे प्रेम एक दिवस व्यक्त करण्यासाठी नाही! वर्षभरात रोजच असतो आमचा व्हेलेंन्टाइन ! तो खऱ्या अर्थानं एका आईचं काळीज आहे!
 प्रत्येक आई साठी रोजच असत तिचं लेकरू तिचा व्हॅलेंटाईन! असा व्हॅलेंटाईन फक्त माझाच आहे असं नाही ! प्रत्येक आई साठी हाच असतो तिचा खरा व्हॅलेंटाईन! तिचं अवघं विश्वच भरून जातं त्याच्या इवल्याशा छुमछुमनं !  फुलपाखराचे दिवस भुर्रकन उडून जातात; पण खर्या अर्थाने कुणासाठी तरी जगणं ,श्वास घेणं , जगण्याचा अर्थ कळणं हे घडतं ते केवळ लेकरू आल्यानंतरच! माझी बोलक्या डोळ्यांची बाहुली, बछडी ,छबु ,बबडी ,परी, शोनूलं हे सगळे अंतःकरणातून तेव्हाच येते जेव्हा घरात इवलीशी पावलं हुंदडू लागतात!! फुलपाखरांच्या दिवसातला व्हेलेंटाईन तर तिच्या लक्षातही राहत नाही ! कारण खरा आयुष्यभराचा व्हेलेंटाईन तिच्या आयुष्यात आलेला असतो आणि ती रोजच भरभरून भरभरून प्रेम करत असते! एका आईचं काळीज म्हणजे तिच्या मुलासाठी हक्काचं स्थान ...... खरा व्हॅलेंटाईन!!! म्हणूनच म्हटलं *हो आहे माझा व्हॅलेन्टाईन* माझं लेकरू .....आणि तो रोजच मी भरभरून साजरा करते ,आयुष्यभर करणार ! श्वासाच्या शेवटापर्यंत !!! माझं पिल्लू ....आत्ताच जेवू घालून निजवलाय !  मीही पटापट जेवून आवरते अन् झोपते त्याला कुशीत शिरायचं असतं ना माझ्या ....... 
                           *- तरुणची ताई ( आई ) आरती बोराडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, February 9, 2018

पॉज



                 वाक्यात विराम असतो ना थोडासा श्वास घेण्यासाठी थांबण्याचा काळ .......!  पॉज् .... म्हणजे थांबणं. भावनांचा आणि विचारांचा आविष्कार करण्यासाठी जसा लेखनात विराम महत्त्वाचा तसा आयुष्यातही ऊर्जेसाठी हा विराम ठरणारी माणसंही तितकीच महत्त्वाची ! यति वगैरे नाही म्हणणार मी पण अशी माणसं ही उर्जेचं ठिकाण असतं ,असं मला वाटतं ! पॉज .... ! कधी येतो तर कधी घ्यावा लागतो ,कधी वाक्य पूर्ण होत आणि आपण सहजच थांबतो.हा पॉज् कधी अल्प असतो तर कधी मोठा असतो! बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द आणि वाक्यामध्ये जसा हा विराम महत्वाचा तसंच आयुष्याच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर आयुष्याचा नीट अर्थ उलगडावा म्हणून अशी विराम ठरणारी ऊर्जेची चिन्ह आपल्या आयुष्यात येतात! तीच असतात आपल्या ऊर्जेचा पॉज्! काही माणसे पूर्णविराम, जी आयुष्याच्या पूर्ण काळापर्यंत स्नेहबंध जोडून जातात. काही अल्पविराम , काही स्वल्पविराम तर काही अगदीच प्रश्नचिन्ह सुद्धा! आणि या अशा विविध चिन्हांच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्याच लेखनही अर्थवाही आणि सहज सुलभ होतं जातं यात काही शंकाच नाही!  
                 म्हणजे बघा हं आपण एखाद्या नवीन ठिकाणी नोकरीनिमित्त जातो. तिथे काही काळ नोकरी करतो बदली होते, नवीन ठिकाणी जातो. पण आधीच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांची attachment आपल्यासाठी ऊर्जास्रोत झालेली असते. कधीकधी ही attachment आयुष्यभर राहते, हे स्नेह धागे आयुष्यभर जोडले जातात तर कधी फक्त थोड्याच काळात पुरती मर्यादित राहतात. पण असतात मात्र ऊर्जास्रोत! त्या त्या वेळी त्या त्या काळी आपल्यासाठी झालेली! किंवा कधीकधी अचानक काहीतरी काम पडतं आणि कुणीतरी धावून येतो आपल्या मदतीला! 
                   आपली जिवलग मैत्रीण, सखी, कामाच्या ठिकाणच्या मैत्रिणी, समोरच्या आजी, शेजारच्या काकू, वॉचमन ताई, कामवाल्या मावशी , गाडीमध्ये सोबत जाणारे सहकारी, शेजारच्या डेस्कवरचे सहकारी, ऑफिसमधले सहकारी, किंवा तालुक्यातले जिल्ह्यातले आपल्या क्षेत्राशी संबंधित जवळचे अनेक लोक, आता तर व्हॅटस् अॅप समूहाच्या द्वारे पण कितीतरी लोक आपल्या संपर्कात येतात. त्यातला चांगला वाईट असा दुनियादारीचा भाग जर सोडला तर काही चांगल्या लोकांशी खूप चांगले संबंध तयार होतात! चांगल्या मैत्रिणी मिळतात , काका , दादा ,ताई अशी छान नातीही तयार होतात ! अडीअडचणीला एकमेकांना मदत करतात! थोड्या काळासाठी का असेना पण अशी प्रेमाची नाती असतात! हे पॉज् आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात ! 
             असे हे विराम कळणं ,उमगणं ,समजणं आणि त्यांना सांभाळही तितकच महत्त्वाचं! विरामचिन्हं शिवायच आयुष्य कसं निरस असेल नाही! चला तर मग आयुष्यातल्या अशा विराम चिन्हांचा शोध घेऊ या ! त्यांना जपू या ! सांभाळू या ! तरच आयुष्याचं लेखन हे अर्थवाही सुगम आणि खरोखर सुंदर होईल ! 
                                 -आरती बोराडे 
                

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...