Thursday, October 4, 2018

स्वतःला आतून घासून-पुसून स्वच्छ ,लख्ख नाही का करता येणार कधी ?



 फोटो क्रेडीट : गुगल





















किती माणसं आपल्या अवतीभवती असतात.आई-वडील, नातेवाईक , बहिण- भाऊ ,चुलत, मावस, सख्खे ,दूरचे ,मित्र- मैत्रिणी, सहकारी इतक्या हक्कांच्या माणसांमध्ये असून सुद्धा आपण एकटे का असतो? किंवा सतत तणावाखाली का असतो? कामाचा ताण खूपच जास्त वाढला आहे असं सतत वाटत राहतं ! मग या सगळ्या जगण्यामधून जी काही नाती आहेत त्या नात्यांकडे जर बघितलं तर ही नाती फक्त गरजेपुरती आहेत असं वाटत राहत. 

खरंतर आता हातात असलेल्या मोबाईलने नात्यांची वाट अगदी सोपी करून दिली आहे. कितीतरी लोकांचे स्टेटस आपण रोज नियमितपणे पाहत असतो ! पण कधीतरी या रोज आवडणाऱ्या कितीतरी जणांच्या भावनांबद्दल आपण खुलेपणाने बोलत नाही. भरभरून कौतुक करत नाही.असं का ? आपलं मन नात्यांमधली सोपी झालेली वाटही का चोखाळत नाही ? 

समजा, एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीने आपलं काम केले नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीने जर आपल्या कामाचा बोजवारा उडाला तर आपण किती अस्वस्थ होतो ,प्रचंड तणावाखाली जातो,अनेक कामांचा निपटारा राहून गेला अशा अविर्भावात आपला अख्खा दिवस जातो आणि मग अशा सततच्या तणावाचा  निचरा होण्याच्या हक्काच्या जागा लागलीच  आपण शोधतो. मग या हक्काच्या जागा सुद्धा गरजेपुरत्याच आहेत असं नाही का वाटत ?  कालपासून मैत्रिणीचे शब्द कानामध्ये घुमत आहेत. ती म्हणत होती, बघ ना या गरजेपुरत्या ठरलेल्या नात्यांच्या पलीकडे पण काही सापडतय का ? आपल्याच आत आपण स्वतःला आणि इतरांना कुठे ठेवलंय हा शोध घ्यायला हवा आहे.

कधी कधी उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबतच एखादया व्यक्तीच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा हृदयाला अलगद स्पर्शून जाते आणि ती व्यक्ती सतत आठवत राहते. 

रोज सोबत असणारी आई ! 'आपल्यासाठी राबणारी आई' ,अशी भावना हि केवळ ती कधीतरी घरी नसली की तिच्या पश्चातच येणारी भावना आहे. 

किंवा कधी काळची काळजात असलेली एखादी व्यक्ती जी आजिबातच संपर्कात नाहीए. काय करते ? कुठे राहते हे देखिल माहित नाही तरिही तिच्या नुसत्याच आठवणीनेही आपण आनंदित होतो.

किंवा कधीही न भेटलेल्या सोशल मिडीयावरील मित्रमैत्रीणींचं उर्जादायी लिखाण , प्रेरणादायी काम पाहून आपणही सुखावतो. स्वतःच्या जगण्याशी हे सारे संदर्भ जोडू पाहतो.  तेव्हा कुठलीही नाती नसलेली माणसे माणूसपणाच्या भावनेतून आपल्याला जवळची वाटू लागतात. 

हे काय आहे ? हेच तर आहे नात्यापलिकडचं स्वतःला खरवडून पाहिलेलं आपलेपण ! कधी काळी कुलुपबंद करून टाकलेल्या नात्यांच्या कठीण कवचाखालीही भावनांचे मृदु तरंग नक्कीच सापडतील ! पण त्यासाठी स्वतःला आतून घासून- पुसून , खरवडून काढायला लागतं, त्याशिवाय मनाचं लख्ख होणं स्वतःला किती उजळून टाकणारं आहे हे कळणार नाही.

 पाण्याचे असंख्य बुडबुडे हवेने फुटावेत त्याप्रकारे नात्यातल्या बॅरियर्सचे बुडबुडे अलगद फुटून मन स्वच्छ , नितळ होऊ लागतं. सगळ्याच नात्यांत स्पष्टता येऊ लागते आणि  एखादया झऱ्यासारखं मन आनंदाने खळाळत जगणं जगू लागते. अर्थात , या प्रक्रियेत समोरच्या व्यक्तीशी आपण कनेक्टेड असू किंवा नसू हा भाग अलाहिदा ! स्वतःशी मात्र पूर्ण कनेक्टेड असतो.

हेच निकोप मन आपल्या हातून अधिकाधिक यशस्वी जीवन  घडवित राहते.



-आरती बोराडे

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...