कुठे गेल्या या टॉपर मुली ?
माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामाच्या ठिकाणचे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने ती बदली होत नाही तोवर माहेरीच राहून कामाच्या ठिकाणी येत असे. नोकरीचे गाव माहेरापासून जवळ होते. मैत्रीण शनिवारी दुपारी सासरी जायची आणि सोमवारी तशीच कामावर यायची. फार व्यक्त होण्याचा स्वभावच नसल्याने अगदी सुरुवातीलाच सोमवारी आली कि मंगळवार पासून तीच रडणं चालू असायचं. जवळपास आम्हाला दोन एक महिने लागले हे कळायला कि ती सासरी गेल्यावर तिथली कामवाली बाई बंद केलेली असायची आणि दोन दिवस एवढ्या मोठ्या खटल्याची धुणीभांडी करून तिचे हात सुजलेले असावयाचे आणि प्रचंड वेदना व्हायच्या. बरं ती शहरात वाढलेली नोकरी करणारी मुलगी अवाक्षर हि न काढता हे सारं करत राहिली. शिवाय कामाच्या ठिकाणी जायला दहा वर्षांपूर्वी साधन नसल्याने किमान चार किलोमीटर अंतर चालत जावे यावे लागे. म्हणजे सोमवारी सासरहून आल्यानंतर रोजची पायपीट चुकणारी नव्हती. त्यात सासरी कसलीही कमी नाही. भला मोठा बंगलो, वॊशिंग मशीनसह सर्व सोयी सुविधांनी युक्त घर शिवाय लग्नात तिला कोणत्याही वस्तूची कमी राहू दिली नव्हती आई वडिलांनी. एवढं सर्व असताना तिची परीक्षा घेण्याची हि कोणती विकृत मानसिकता? विशेष म्हणजे तिला upsc परीक्षा interview चे पत्र आलेले असतानांही तिला तू हे करू शकत नाहीस असं म्हणून जाऊ दिले नाही. ती लग्नापूर्वी पासून परीक्षेचा अभ्यास करत होती. लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच तिला हे पत्र मिळाले होते.
यानंतर ती जेव्हाही भेटली तेव्हा फक्त रडते. संसार नवरा मुलं सासू- सासरे , नणंदा -भाचे सगळा परिवार सुखात आहे. नवऱ्याचे अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तरीही फक्त रडते कारण तिचे पंख किती सुरेख आणि बळकट होते याचे साक्षीदार होते मी आणि ते छाटले जाण्याच्या दुर्दैवी क्षणांचीहि साक्षीदार होते मी.
गेल्या आठवड्या पासून कुठे गेल्या या टॉपर मुली च्या शीर्षकाने फिरणारा मॅसेज वाचला आणि असे असंख्य प्रसंग समोर उभे राहिले. सोबत काम करणाऱ्या पाच आकडी किंवा अगदी ऐंशी हजारापर्यंत पगार घेणाऱ्या महिलांच्या समस्यां ह्याच स्वरूपाच्या आहेत. त्यांना कामाहून घरी आल्यानंतर कामात थोडी मदत मिळावी म्हणून कामाला बाई लावण्याची परवानगी हवी आहे किंवा मग मुलांचा अभ्यास तरी घरातल्या कुण्या व्यक्तीने घ्यावा असे तिला वाटते किंवा मग माझ्या मासिक पाळीच्या काळातील वेदना जास्त असतात त्या नाही सर्वांसमोर सांगता येत नाही म्हणून तरी नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात आणि कामात हातभार लावावा. शारीरिक आणि मानसिक आंदोलनांच्या काळात घरातल्या आपल्या माणसांनी समजून घ्यावे हि प्रत्येक स्त्रीची किमान अपेक्षा असते. तशी ती करण्यात काही गैरही नाही मात्र त्या पूर्ण न झाल्यास अनेकदा वादाला तोंड फुटते आणि मग तिला तिच्या नोकरीचा आणि पगाराचा घमंड आहे असा सरळ सरळ अर्थ काढला जातो. या जात्यात अडकलेल्या असंख्य स्त्रिया नंतर स्वतःला यातच अडकून घेण्याची सवय लावून घेतात काही प्रचंड भरडल्या जातात तर काही लवकरच यातून बाहेर पडून आपले आयुष्य जगू लागतात. अर्थात यातल्या कुठलीही टप्प्यावरच्या स्त्रीला जगणे सोपे नाहीच कारण तितक्या उदार आणि विशाल दृष्टीकोनाची अजूनतरी आपली सामाजिक परिस्थिती नाही हे मान्य करायला हवे आहे.
एका कवीने लिहून ठेवले आहे,
All women in the world,
speaks same language of silence.
किंवा मग
'नाही पुसत ग कोणी रंग रुपला आपुल्या
दाणं पाखडून द्याया नुसत्या आपण सुपल्या '
किंवा मग
' कानातल्या कुडकांना, आला अहेवाचा मान
गुंजभर सोन्यासाठी, बाई जल्माची गहाण
हातीपायी बेड्या तिच्या, नाकी कानी टोचतात
संसाराचे रखवाले, जीवावर उठतात
तिच्या जलमाची नोंद नाही कुठं दप्तरात
तिच्या मरणाची वर्दी नाही कुण्या कचेरीत '
यांसारख्या बाईपणाचे अस्तर उलगडून मांडणाऱ्या कवींना माझा सलामच आहे मात्र परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे हे आपल्या सामाजिक उत्थानाचं खूप मोठं अपयश आहे.
स्त्रीच्या नव्या सामाजिक दर्जानुसार पुरुषाच्या दृष्टिकोनात फरक पडलेला असला तरी स्त्रीला सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यात वेगवेगळे मुखवटे घेऊन वावरावे लागते तसं पुरुषाचं नसत. कारण स्त्री घराबाहेर जेवढी यशस्वी होईल तितके तिला कुटुंबात नम्र वागावे लागते. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तिला सामाजिक सिद्धतेसाठीच्या संघर्षात तिचे स्त्रीसुलभ गुणविशेष सांभाळणे या कसरतीत तिचा विलक्षण गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया परंपरागत भूमिकेकडे वळत आहेत. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत्व फुलावण्यापेक्षा परंपरागत भूमिकांत अडकणे जास्त सुखकर आणि सोपे आहे. पण काळाचे चाक उलटे फिरवता येत नाही. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने परिस्थितीतील बदल मोकळया मानाने स्वीकारणे हेच श्रेयस्कर नाही काय ? अशाने स्त्रीला संपूर्ण माणूस म्हणून दर्जा निश्चित प्राप्त होईल. मग या टॉपर मुली निश्चितच हरवणार नाहीत.
- आरती बोराडे
प्राथमिक शिक्षक , इगतपुरी